
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून उंटांचे जत्थे दाखल होताना दिसत असून आतापर्यंत दाखल झालेल्या उंटांच्या कळपातील 111 उंट अत्यंत अशक्त आणि कुपोषित असल्याचे दिसत आहे. या उंटांना नाशिकमध्ये आणण्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वाईट अवस्थेतील हे उंट पाहून प्राणीमित्रांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.
सर्व उंटांची रवानगी नाशिकच्या पांजरपोळमध्ये करण्यात आली असून सध्या या उंटांवर तिथेच उपचार करण्यात येत आहेत. श्री नाशिक पांजरपोळ संस्थेतर्फे 6 पशु वैद्यकीय अधिकार्यांना उंटांच्या उपचारासाठी नेमण्यात आले आहे. 3 उंटांचा 10 मे पर्यंत मृत्यू झाला. इतर 18 उंटांवर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत.
दरम्यान, आणखी 43 उंट नाशिकच्या सीमेवर मालेगाव परिसरात दाखल झाले. नव्याने आलेल्या उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मालेगाव परिसरातील पांजरापोळमध्ये ठेवता येईल का, याची चाचणी सुरू आहे.
प्रशासनाने सुरूवातीला पांजरापोळकडे स्वाधीन केलेल्या 109 उंटांवरील उपचार आणि त्यांच्या खाण्या-पिण्यासाठी दिवसाचा 35 ते 40 हजार रुपयांचा खर्च होत आहे. त्यांना ऊस, गूळ, शेंगदाणे आणि ज्वारीचा कडबा असा आहार दिला जात आहे. त्यांच्यावर औषधोपचार केले जात असून काहींना सलाईन लावण्यात आली आहे.

संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी त्यांच्या व्यवस्थेबाबत माहिती दिली. हे उंट राजस्थान सरकारने परत घेऊन जावेत आणि त्यांना नैसर्गिक राहण्यायोग्य ठिकाणी सोडून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व उंटांना एक इंजेक्शनही द्यावे लागत आहे. सुमारे 200 ते 300 रुपये प्रति इंजेक्शन अशी त्याची किंमत आहे. उंटांच्या सुश्रुषेपोटी लागणारा खर्च पांजरापोळला द्यावा, असे पशुवैद्यकीय विभागाने सुचविले आहे.
उंटांच्या रक्त आणि अन्य चाचण्या शासकीय प्रयोगशाळेमार्फत करण्यात आल्या. पशू वैद्यकीय चिकित्सालयात उपलब्ध औषधेही मोफत स्वरुपात दिली जात असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.वैशाली थोरात यांनी सांगितले. प्रशासनाने उंटांची सोय केली असली तरी राजस्थानातून हे उंट नेमके कुठे चालले होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
राजस्थान सरकारचा राज्यपशू उंट आहे. राजस्थान सरकारने 2015 साली काढलेल्या अध्यादेशानुसार राजस्थान बाहेर उंट ने-आण करणे, विक्री करणे, तसेच उंट गाडीला जोडणे यावर बंदी आहे. विशिष्ट कारणासाठी उंट बाहेर न्यायचे असले तरी त्यासाठी परवानगीची मोठी प्रक्रिया आहे, पण नाशिकमध्ये दाखल एकाही उंट मालकाकडे त्यासंबंधी परवानगी पत्र अथवा मालकी हक्काची कागदपत्रे नव्हती.
महाराष्ट्रातील नंदूरबार, सटाणा, वणी यांसारख्या इतर ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उंटांचा ताफा बघावयास मिळाल्याने त्याबाबत साशंकता व्यक्त होत होती.
उंट नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मंगलरूप गोशाळेचे पदाधिकारी आणि जिल्हा पशुकल्याण अधिकारी पुरुषोत्तम आव्हाड यांनी तत्काळ याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि महापालिकेला माहिती दिली. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी 111 उंटांना पांजरापोळच्या सुरक्षित ठिकाणी जंगलात घेऊन जाण्याचे आदेश दिले. गुरुवारी 4 मे रोजी रात्री 89 तर 5 मे शुक्रवारी सकाळी 22 अशा एकूण 111 उंटांना पांजरापोळच्या सुरक्षित जंगलात सोडण्यात आले म्हणून आम्ही उंट ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित केले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे उंट तस्करी करून हैद्राबाद येथे कत्तलखान्यात नेत असावेत, अशी शंका व्यक्त होत आहे. पुढच्या महिन्यात पाऊस सुरू होणार आहे. नाशिकमधील पावसाचे वातावरण उंटासाठी प्रतिकूल असणार आहे. आम्ही राजस्थान सरकारच्या पशुविकास खात्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहोत. राजस्थानपर्यंत वाहतूक करत उंट पोहचवणे अडचणीचे असल्याचे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सगितले.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून त्यात या उंटांना अन्नपाण्याविना ठेवत शेकडो किलोमीटर चालवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उंटांना क्रूर वागणूक देणाऱ्या 7 जणांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 3 मालक नाशिक शहरातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.