
वर्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. खरीप हंगाम जवळ आला असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणतीही अडचण येवू नये यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान, यावेळी राज्यात कुठेही खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
यंदा ‘अल निनो ‘ चे सावट असल्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्याचे त्यांनी सांगितले. कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच पिकांवर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावाबद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरता जिल्ह्यात २५० शेतीशाळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. बनावट बियाणे विकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना मिळणारे कोणतेही अनुदान बँकांना कर्ज खात्यात जमा करता येणार नाही. याबाबत बँकांना सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांचे बिल थकीत असले तरी वीजपुरवठा बंद करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही आज झाली. ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची देय रक्कम पूर्ण झाली आहे, त्या पंपांच्या जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यातील 100 गावांची निवड करून तातडीने कामे पूर्ण व्हावी, असे त्यांनी सांगितले. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.