राज्य शासनाकडून जालना महानगरपालिकेची घोषणा
जालना नगरपालिका राज्यातील 29 वी महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे. सरकारने तसे आदेश काढले असून याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाकडून जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या.
जालन्याची ‘स्टील इंडस्ट्रीज’ आणि ‘मोसंबी उत्पादक जिल्हा’ अशी राज्यभरात ओळख आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. या पाठपुराव्याला मोठे यश लाभले आहे.
बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार शहर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी- निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, अकोला ,उल्हासनगर, सांगली, मिरज-कुपवाड शहर, मालेगाव, जळगाव, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी या महाराष्ट्रातील महानगरपालिका आहेत.

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. ‘स्टील उद्योगा’मुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे, तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पहायला मिळते. येथील मोसंबी प्रसिद्ध असून ती दिल्लीपर्यंत विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हा जिल्हा आहे.