भारत गौरव यात्रेत महाराष्ट्राला नगण्य स्थान
केंद्र सरकारने ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत महाराष्ट्राला नगण्य स्थान देण्यात आले आहे.

पुण्यातून २८ एप्रिलला सुरू झालेल्या यात्रेत उत्तर भारतातील पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. दुसरी यात्रा ११ मेपासून सुरू होत आहे. यात उत्तर भारतातील आग्रा, अमृतसर, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, उज्जैन आणि वैष्णोदेवी येथील स्थळांचा समावेश आहे. मुंबईतून २३ मे रोजी सुरू होणाऱ्या भारत गौरव यात्रेत बंगळुरू, कन्याकुमारी, मदुराई, म्हैसूर, रामेश्वरम, तिरुअनंतपुरम, तिरुपती या दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटनस्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा समावेश असलेली केवळ एकच भारत गौरव यात्रा आहे. तिरुअनंतपुरममधून सुरू होणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर, शिर्डी या फक्त 3 स्थळांचा समावेश आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात अनेक तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, गडकिल्ले आहेत. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांच्यामार्फत आम्ही रेल्वेमंत्र्यांकडे करणार असल्याचे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे.
भारतातील समृद्ध वारसा पर्यटकांना, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखविण्यासाठी रेल्वेने ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत उत्तर आणि दक्षिणेतील धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर भर देण्यात आल्याने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना डावलले जात असल्याचे एकंदर चित्र आहे.