वीट निर्मिती
भारताच्या आधुनिकीकरणामुळे भारतीय लोकांचे जीवनमान बदलत आहे. पारंपरिक दगड-मातीच्या घरांची जागा सिमेंट-काँक्रीट आणि विटांच्या घरांनी घेतली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत. शहरांचा विस्तारही वाढला आहे. बेरोजगार मंडळी शहरांमध्ये काम शोधून वास्तव्य करताना दिसत आहेत. शहरात मोठ्या लोकसंख्येच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बहुमजली इमारतींमध्ये राहण्याची सोय सुरू झाली. सध्या अशा इमारती, मोठी धरणे, अशा कामांसाठी विटांना मोठी मागणी आहे. मागणीत वाढ होत असल्याने वीटभट्टी उद्योगांना चांगले दिवस आले आहेत.

पूर्वी वीटभट्ट्या फक्त ग्रामीण भागातच होत्या; मात्र आज प्रत्येक शहराभोवती अशा वीटभट्ट्या आहेत. मातीपासून बनवलेल्या भाजलेल्या विटांची घरे प्राचीन काळी होती, परंतु आता पारंपरिक बांधकाम पद्धती बंद झाली आहे. भाजलेल्या विटा, सिमेंट ब्लॉकच्या विटा, ठोकळा सिमेंटच्या विटा, मोठ्या भाजलेल्या विटा तयार केल्या जात असून त्यांना मागणीही आहे.
लघुउद्योग म्हणून वीटभट्टी उद्योग देशाच्या प्रत्येक भागात केला जातो. चांगल्या प्रतीची माती आणल्यानंतर ती माती काही दिवस भिजवून ओली केली जाते. उसाच्या वरच्या भागावरील पाने, (पाचट) चिपड किंवा गहू, भाताचा भुसा एकत्र मिसळून ही माती तुडवली जाते. अशी माती बहुधा नदीपात्रातून आणलेली असावी. अशी माती तुडवून त्या चिखलाला योग्य आयताकृती आकार दिला जातो. दगडी कोळसा आणि ज्वलनशील पदार्थ टाकून भट्ट्या पेटवल्या जातात. त्या विशिष्ट पद्धतीने लावून त्यावर कच्च्या विटा रचून ठेवल्या जातात. अशा पद्धतीने त्या भाजतात. अशा वीटभट्ट्या पारंपरिक पद्धतीने पण शास्त्रानुसार बांधल्या जातात.

प्राचीन काळापासून अशा पारंपरिक पद्धतीने विटा बनवल्या जातात; पण सध्या आधुनिक स्वयंचलित अशी यंत्रेही आली आहेत. अशी यंत्रे माती भिजवण्यापासून ते विटांना आकार देण्यापर्यंतचे काम करतात. अशा विटा उच्च क्षमतेच्या विद्युत भट्टीत टाकल्या जातात. अशा आधुनिक पद्धतीने विटा तयार करणे लघुउद्योजकांसाठी महागडे आहे, परंतु विक्री क्षेत्र मोठे असेल आणि आर्थिक नियोजन असेल तर अशा आधुनिक वीटभट्ट्या उभारण्यात काहीच गैर नाही. विटांना आकार देण्यासाठी हातांनी हाताळावी लागणारी यंत्रसामग्रीही आज बाजारात उपलब्ध आहे. घर बांधण्यासाठी विटा लागतात. कमी भांडवलात कष्ट करण्याची तयारी असलेल्या बेरोजगार उद्योजकांनी हा व्यवसाय निवडलाच पाहिजे. भट्टी उभी करताना पूर्ण माहिती घेऊन किंवा कुशल प्रशिक्षित लोकांकडून भट्टी उभी करून घ्यावी. कच्च्या विटांचे पावसापासून संरक्षण केले तर या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता नसते.
5 ते 10 लोकांचे कुटुंब असेल तर घरातील सर्व लोक वीटभट्टीवर काम करतात. त्यामुळे सर्वांना रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. वीटभट्टी उद्योगासाठी ग्राहक शोधावे लागत नाहीत, हे वैशिष्ट्य आहे. ज्यांना घरे बांधायची आहेत, ते वीटभट्ट्यांवर वैयक्तिकरित्या विटा खरेदी करण्यासाठी येतात. मोठमोठ्या इमारती बांधणारे अभियंते, कंत्राटदार, बिल्डर आगाऊ पैसे देऊन वीटभट्टीवरच माल निश्चित करतात. घाऊक व्यापारी वीटभट्टी उत्पादकाकडून विटा विकत घेतल्यानंतर चढ्या भावाने विटा विकण्याचा व्यवसाय करतात. तेही वीटभट्टी उत्पादकांचे मोठे ग्राहक आहेत. माती, दगड, कोळसा, भुसा, पाणी इ. कच्चा माल यासाठी आवश्यक असतो. या उद्योगासाठी विविध यंत्रसामग्री उपलब्ध आहे. विटांना आकार देण्यासाठी स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर, पाण्याची मोटार, बोअरवेल, कोळसा क्रशर इत्यादी यंत्रसामग्री विटांची वाहतूक करण्यासाठी आणि माती आणण्यासाठी वापरली जाते. आपणास जसे परवडेल तशा पद्धतीने सुरुवातीला यंत्रांची तजवीज करावी.