
‘कलर्स मराठी’ वरील सरस मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये आता नव्या मालिकेचा समावेश होणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. ही 2 बहिणींची कथा आहे. बहिणींच्या नात्यातील घट्ट बांध या मालिकेतून अनुभवता येणार आहेत. या मालिकेचे नाव ‘काव्यांजली’ असून ही मालिका दिनांक २९ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘काव्यांजली’ मध्ये काव्या आणि अंजली या 2 बहिणी आहेत. काव्याने तिच्या आयुष्यातील सगळी दुःखे, अडचणी हसत झेललेल्या आहेत. लग्नाला १२ वर्ष झाली; परंतु तिचा नवरा तिला चांगली वागणूक देत नाही. तरीही ती हसतमुख आहे. ती तिची बहीण अंजलीसाठी मुलगा शोधत आहे. त्यावर आपल्या बहिणीच्या नवऱ्यासारखा नवरा आपल्याला नको असे अंजली सांगते. आई-वडील गेल्यानंतर काव्याने अंजलीला मोठे केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णी आणि अभिनेता पियुष रानडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेत्री पूजा पवार यांचीही मालिकेत मुख्य भूमिका आहे.
2 लोकप्रिय कलाकार या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत. ही मालिका रात्री ८. ३० वाजता ‘कलर्स’ वाहिनीवर सुरु होणार आहे. आता ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचा टीआरपी कमी झाला आहे. त्यामुळे ही मालिका निरोप घेण्याची शक्यता आहे.