
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्त्यांवर आज सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या 12 आमदारांच्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादीच कायम ठेवावी. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली, असे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे. सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करायला हवे. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे अजूनपर्यंत ही नियुक्ती होऊ शकलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात आज 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर सुनावणी होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल देताना अनेक बाबी न्यायालयाने स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.