
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना’चे औचित्य साधून अनेक वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी केली. त्याचप्रमाणे एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणेही यावेळी जारी करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, “अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. याद्वारे भारताने आपले वैज्ञानिक पराक्रम सिद्ध केले. जागतिक स्तरावर भारताचा मान उंचावला. एक काळ असा होता जेव्हा तंत्रज्ञान सामान्य भारतीयांच्या आवाक्याबाहेर होते, परंतु आज रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते रिक्षाचालकांपर्यंत सर्व डिजिटल साधने वापरत आहेत. भारत हे जगातील तिसऱ्या मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टीमचे घर आहे. जग आर्थिक परिवर्तनातून जात असताना भारतातही वाढ झाली आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5800 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक प्रकल्पांची यावेळी पायाभरणी केली. सन 2014 मध्ये देशात फक्त 150 उष्मायन केंद्रे होती. आज या केंद्रांची संख्या 650 च्या पुढे गेली आहे.
ते म्हणाले की, “2014 पासून भारताने ज्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले असल्यामुळे मोठे बदल झाले आहेत. जे विज्ञान पूर्वी केवळ पुस्तकांपुरते मर्यादित होते, ते आता प्रयोगांच्या पलीकडे जाऊन पेटंटमध्ये बदलत आहे. आम्ही सुरू केलेली ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम आणि ‘डिजिटल इंडिया’ मोहीम तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाला नवी उंची दिली आहे.” यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि डॉ. जितेंद्र सिंह देखील उपस्थित होते.