एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त सेवा
नागपूरकरांचा मुंबईचा प्रवास आता सुखकर होणार आहे. ‘एअर इंडिया’ने मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच ‘गो फर्स्ट’ कंपनीने घेतलेल्या विमान उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवासावर परिणाम होत असताना ‘एअर इंडिया’च्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. येत्या २० मेपासून ‘एअर इंडिया’ची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा होणार सुरु होणार आहे.

दरम्यान, ‘एअर इंडिया’च्या या विमानामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटदरात घसरण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच या तिकीट सेवेत वाढ करण्यात आल्याने प्रवासी चिंतेत होते. या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिनांक २० मेपासून सुरू होणारी ही सेवा २८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. ‘एअर इंडिया’चे ‘एआय-१६१३’ हे विमान यासाठी सज्ज असून हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण करून नागपूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर हेच विमान ‘एआय-१६१४’ या क्रमांकाने पुन्हा नागपूरहून मुंबईसाठी उड्डाण करेल. हे विमान नागपूरमधून दुपारी १२:०५ वाजता उड्डाण करणार आहे. ‘एअर इंडिया’ कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त उड्डाणाचा निर्णय घेतला आहे. दिनांक २८ ऑक्टोबरनंतर हे विमान नियमित केले जाण्याची शक्यता आहे.