वन्य प्राण्यांमुळे लाखो हेक्टर शेतपिकांचे नुकसान
महाराष्ट्रात वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेली ३७ हजार ६२३ प्रकरणे शासनदरबारी दाखल झाली आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चराई क्षेत्रातील घट, वन्य प्राण्यांची वाढती संख्या, अपुरे जंगल यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.

देश-विदेशातील पर्यटकांना प्राणीदर्शनाची संधी असलेल्या क्षेत्रासह राज्यभरातील अन्य जंगलांत वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे लाखो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि अन्य जंगलांतील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरू आहे. दुसरीकडे पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. विस्तृत वनक्षेत्र मर्यादित होऊ लागले आहे. पाळीव जनावरांची संख्या वाढून वनांवरील अवलंबनात वाढ झाली आहे. परिणामी, वनक्षेत्र घटल्याने तृणभक्षक प्राणी पिकांना लक्ष्य करीत आहेत.

सन २०२१-२२ मध्ये पीक नुकसानीच्या ८७ हजार ६७५ घटना घडल्याच्या नोंदी महाराष्ट्र वन विकास विभागाच्या संकेतस्थळावर आहेत. नुकसानीची भरपाई जलदगतीने मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. नुकसानाची तिव्रता कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना पर्यायी पिकांबद्दल माहिती आणि प्रोत्साहन दिले जात आहे, असा दावा वन विभागाने केला आहे.