
छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक लहानसा डोंगर आहे. या डोंगरावर कातळात कोरलेला ‘भांगसी गड’ हा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला ‘भांगसाई गड’ या नावानेही ओळखतात. भांगसाई देवी ट्रस्टने भुयारी मंदिरावर नवीन मंदिर आणि गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे या गडावर औरंगाबाद परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे.
भांगसी गड हा किल्ला औरंगाबाद-देवगिरी रस्त्यावर आहे. हा गड पाहण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो. भांगसी गडाचा इतिहास उपलब्ध नाही. या गडावर कातळात खोदलेली टाकी आणि गुहा आहे. ‘भांगसी’ गड चढताना गडमाथ्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायऱ्या संपून कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराची कमान उध्वस्त झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे लागते. वाटेत मंदिरासमोर एक बुजलेली टाकी पहायला मिळते. भांगसाई देवीच्या मुळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.

मुर्तीच्या डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून रांगत गेल्यावर प्रशस्त गुहेत पोहोचतो. या कातळात कोरुन काढलेल्या गुहेला २५ खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा 2 स्तरात खोदलेली आहे. उजव्या बाजूस पाण्याचे विशाल तळे खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गुहेच्या उजव्या बाजूला गणपतीची मुर्ती, शिवलिंगआणि नंदी आहेत. भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरडे तळे आहे. गडाच्या दुसर्याध बाजूला दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजासमोर कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडीप्रमाणे होत असावा. आज या गुहा बुजलेल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरापासून ‘शरणपूर’ गाव साधारण १० किमीवर आहे. येथून डाव्या बाजूच्या रस्त्याने पलिकडे गेल्यावर ‘भांगसी’ गडाचा एकमेव डोंगर आहे. येथे गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावर डावीकडे जाणारा रस्ता ‘भांगसी’ गडाच्या पायथ्यापर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे ते ३० मिनिटे लागतात. छत्रपती संभाजीनगरहून वेरूळ, मनमाड, चाळीसगावकडे जाणाऱ्या एसटीने शरणपूर फाट्याला उतरावे. तेथून चालत पाऊण तासात किल्ल्यावर जाता येते.