मुंबईतील काही वसाहतींना पावसाळ्यात धोका
मुंबई पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व पाहणीतून जोरदार पावसात डोंगर भागात दरड कोसळण्याची भीती असल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत तब्बल २७९ दरडीची ठिकाणे आहेत. त्यापैकी ७४ ठिकाणे धोकादायक स्थितीत असून ४५ ठिकाणे अतिधोकादायक आहेत.

दरम्यान, वाशीनाका येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी पावसाळा जवळ आल्यावर काही दिवस आधी दरडीखाली राहणे धोक्याचे असून तातडीने स्थलांतर करावे, अशा नोटिसा बजावल्या जातात. मुसळधार पावसात दरड पडून काही माणसे जखमी होतात, तर काहींना जीव गमवावा लागत असून हे दरवर्षी घडते. मुंबईतील जागांचे भाव परवडणारे नसल्याने आम्ही अन्यत्र जाऊ शकत नसल्याचे रहिवासी सांगतात.
पावसाआधी दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, लोखंडी दोर बांधणे तसेच मातीची धूप थांबवणे या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. मातीमुळे बुजलेल्या जागा मोकळ्या केल्या जातात, अशी माहिती उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शहरात मलबार हिल, ताडदेव, वरळी, ॲण्टॉप हिल, पूर्व उपनगरात घाटकोपर, असल्फा गाव, विक्रोळी सूर्यनगर, चेंबूर वाशीनाका, भांडुप, चुनाभट्टी, कुर्ल्यातील कसाईवाडा आदी ठिकाणच्या दरडीखाली काही कच्च्या, तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या हजारो झोपड्या आहेत. गेल्या काही वर्षांत दरडींच्या ठिकाणी राज्य सरकारकडून संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संरक्षक भिंती बांधण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाते. म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भिंत बांधण्याचे काम केले जाते.
दरम्यान, ‘अतिधोकादायक’ दरडींच्या ठिकाणी वसलेल्या झोपड्यांतील रहिवाशांना पावसाआधी पालिकेकडून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेतर्फे परिसरातील पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाते. राज्य सरकारकडून येणाऱ्या सूचनांनुसार पालिका दरवर्षी आपली भूमिका बजावत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.