Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

राजपूत समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध

छत्रपती संभाजीनगर शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राजपूत समाजाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. या समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येऊन त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ”महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलेसे केले. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत.”

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल, पण देशसेवा महत्त्वाची मानणारा हा समाज आहे. या समाजाला कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *