चिपी विमानतळाच्या नामांतराची केंद्राकडे मागणी
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या नामांतराबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मागणीचा पुनरुच्चार करून केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. या नामांतराच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना या मागणीचे एक निवदेनही दिले असून ते ट्विटरवर शेअर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, ”चिपी येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव जिल्ह्यातील विमानतळास देऊन आपल्या भूमीपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्गवासीयांना शक्य होईल. याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने घेतला असून १ फेब्रुवारी २०२३ रोजी तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे.”
चिपी, सिंधुदुर्ग येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. बॅ नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता. संयुक्त… pic.twitter.com/zNF5MLBRFw
— Supriya Sule (@supriya_sule) May 15, 2023
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसदपटू दिवंगत बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.