फुलशेती

जागतिकीकरणानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून अल्पभूधारक शेतकरी याकडे आकर्षित होत आहे. जागतिक बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या असून त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. या माध्यमातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. जगभरात ५0 पेक्षाही जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादनआणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. चीन आणि भारतामध्येसुद्धा फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगामध्ये जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो.

व्यापारी दृष्टिकोनातून असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व आलेले आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरे प्रदूषणमुक्त ठेवणे अपेक्षित आहे. जेव्हा शहरे इमारतीने न बहरता झाडाझुडपांनी, फुलांनी,बागांनी, हिरवाईने नटलेली असायला हवीत. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशाच प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, घराच्या सभोवतालचा मोकळा परिसर यामध्ये फुलझाडे विकसित करावीत. शुद्ध आणि खेळती हवा, सुंदर प्रसन्न वातावरण आणि सभोवार पसरलेली हिरवळ माणसाच्या मनाची उमेद वाढवते. मन निरोगी ठेवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.
फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली, तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. व्यापारी तत्त्वावरील आधुनिक फुलशेती ही अलिकडची संकल्पना आहे. पूर्वी यापासून भरपूर दर्जेदार उत्पादन मिळत नव्हते. आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ यानुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात दर्जेदार फुलोत्पादन घेणे क्रमप्राप्त आहे. जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे. त्यामध्ये ६ ते २० टक्के प्रतिवर्षी वाढ होत आहे.

फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा मात्र अतिशय नगण्य (०.०७ टक्के ) आहे. गेल्या काही वर्षांमधील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेता मुंबई, पुणे, बेंगळूरू, हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी वाढल्याचे दिसून येत आहे. तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्य आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्र आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती केली जाते. उच्च प्रतिची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन व समारंभासाठी लागणारे व्यासपीठ सजविण्यासाठी वापरतात. फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे इ. तयार करण्यासाठी वापरतात. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, शेवंती इत्यादींच्या सुट्या फुलांना मोठी मागणी असते. याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही खूप मोठी संधी आहे. मोठ्या शहरामध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि ‘स्मार्ट सिटी’ची उभारणी करणे यासाठी फुले अतिशय महत्त्वाची ठरत आहेत.