
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी राज्यभरातून एसटी महामंडळाच्या ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या विशेष गाड्या २५ जून ते ५ जुलै या दरम्यान धावणार आहेत. २७ जूनला ‘वाखरी’ येथे होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. या काळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना-वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठल दर्शनानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या 6 प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पंढरपूरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीकरिता यात्रा कालावधीत चंद्रभागा, भिमा, पांडुरंग आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी 4 तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.