कोकण रेल्वे मार्गावर आज ‘वंदे भारत’ची चाचणी
भारतीय रेल्वे अत्याधुनिक ‘वंदे भारत’ एक्सप्रेस देशभरात सर्वत्र सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्राला पाचवी ‘वंदे भारत’ रेल्वे मिळणार असून ती ‘मुंबई ते गोवा’ दरम्यान धावणार आहे. ‘वंदे भारत’ रेल्वेची आज चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे बोर्डाचे आणि मध्य व कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. नुकतीच मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झालेली आहेत.

‘वंदे भारत’ ही अत्याधुनिक रेल्वे असून सध्या देशभरातील १४ मार्गांवर धावत आहे. ‘मुंबई ते अहमदाबाद’, ‘मुंबई ते साईनगर-शिर्डी’, ‘मुंबई ते सोलापूर’ आणि ‘नागपूर ते बिलासपूर’ मार्गावर महाराष्ट्रात ‘वंदे भारत’ धावत आहे. आता पाचवी ‘वंदे भारत’ मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या एका गाडीची किंमत सुमारे ११० कोटी आहे. प्रवासी सुविधेसाठी अपघातरोधक कवच यंत्रणा या गाडीत कार्यान्वित आहे. मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

ही गाडी ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावते. संपूर्ण डबे वातानुकुलीत आहेत. या गाडीला स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असलेल्या या गाडीमुळे पर्यटनासही वाव मिळणार आहे.