मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यातील नियोजन
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मध्य आणि पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, एमएमआरडीए, म्हाडा, मुंबई मेट्रो, सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

पावसाळ्यामध्ये मुंबईतील विविध भागांत पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी ४८० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप लावण्यात येणार आहेत. या पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण असणार आहे. पंप चालविण्याची जबाबदारी असलेल्या संबंधितांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आधी सराव करून बघितला जाणार आहे. एखादा पंप वेळेत सुरू न झाल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या बैठकीत दिले.
शहर आणि उपनगरामध्ये १५ मे नंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे ३ चमू सज्ज असणार आहेत. पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त चमू तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील साथजन्य आजारांवर मात करण्यासाठी पालिकेकडून ३ हजार खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी पाण्याचे नमुने घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पावसाळ्यात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागात ५ शाळांमध्ये नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी अन्नसुविधा देण्यात येणार आहे. नौदल तसेच अग्निशमन दलालाही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान, धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या बैठकीत धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले.