
मध्यप्रदेशमधील मंदसौरचे ‘गांधीसागर अभयारण्य’ लवकरात लवकर चित्त्यांसाठी तयार केले जाईल. चित्ता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव इक्बालसिंग बैंस यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीमध्ये सद्यस्थितीची माहिती देताना वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदिस्त जागेत दीर्घकाळ राहिल्याने होणारे साथीचे रोग टाळण्यासाठी काही चित्त्यांना अन्य ठिकाणी हलवणे अत्यंत गरजेचे आहे.
राज्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन जे.एस.चौहान यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे.एन. कानसोटिया यांना पत्र लिहिले आहे. काही चित्त्यांना कुनो येथून हलवावे लागेल असे या पत्रात म्हटले आहे.

या पत्राचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे गुरुवारी मुख्य सचिवांनी चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला. ज्यामध्ये चित्ता टास्क फोर्सच्या स्थानिक सदस्यांना पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मुख्य सचिवांना सविस्तरपणे सांगितल्या आहेत. हा भारत सरकारचा प्रकल्प असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ते म्हणाले की, चित्ता कृती आराखड्यात निश्चित केलेल्या मुद्यांवर काम करावे. आम्ही सांगत असूनही ते निर्णय घेत नाहीत. ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची होती. ती आम्ही पार पाडली. आपण संपूर्ण समर्पणाने ‘गांधीसागर’ आणि ‘नौरादेही’ अभयारण्ये तयार करू. ‘गांधीसागर’ आणि ‘नौरादेही’ची मध्य प्रदेशातील चित्त्यांसाठी निवड करण्यात आली आहे. गांधीसागरसाठी 15 कोटींचा निधी मिळाला असून यामध्ये ‘चॅनल फेन्सिंग’ करण्यात येणार आहे. कुंपण बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.