आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कर्ज योजना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा करण्यात आली. ही योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात कर्ज योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य बँकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे कौतुक केले.

या योजनेंतर्गत मुलामुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी, तसेच 5 ते 10 लाखांपर्यंत 2 टक्के आणि 10 ते १५ लाखांपर्यंत 4 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांनी त्यांचे शिक्षण या योजनेद्वारे पूर्ण करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य सरकारला देय असलेला 10 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय बँकेच्या सेवक वर्गास असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन उप सरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांनी केले.
यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी मंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते. बँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.