कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र
कोल्हापूर शहरात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय ‘अधिवेशन केंद्र’ उभारण्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील ‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर चर्चा केली.

कोल्हापूर शहरातील ‘राजाराम तलावा’च्या काठी हे संकुल उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 हजार आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, बहुउद्देशीय सभागृह, बैठक कक्ष, आर्टगॅलरीस खुले प्रेक्षागृह अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे ‘राजाराम तलावा’त संगीत कारंजे, लाईट आणि साऊंड शो अशी आकर्षणे असतील. नगरविकास विभागाच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूर या ऐतिहासिक शहराच्या वैभवात भर घालणारे हे अधिवेशन केंद्र वर्षभरात तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे झालेल्या या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.