नाशिकमधील उंट पालकांच्या स्वाधीन
राजस्थानमधून हैद्राबादच्या दिशेने निघालेला उंटांचा जत्था नाशिकमध्ये रोखण्यात आला होता. कत्तलीच्या उद्देशाने हे उंट पाठविण्यात आले होते. नाशिक जिल्हा प्रशासनाने या १०० उंटांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार केले होते. हे उंट कत्तलीच्या उद्देशाने पाठविण्यात आल्याचे चौकशीअंती समोर आले होते. उपचारानंतर हे उंट त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले.

राजस्थानातून शुक्रवारी नाशिक येथे या उंटांचे पालक आल्यावर त्यांच्याकडे हे उंट सोपवण्यात येऊन त्यांना राजस्थानकडे रवाना करण्यात आले. राजस्थानपासून महाराष्ट्रापर्यंतचे शेकडो किलोमीटर अंतर चालल्याने तब्बल १२ उंटांचा प्रवासात मृत्यू झाला होता. उर्वरित उंट उपासमारीमुळे अशक्त झाले होते. गेले काही दिवस या उंटांवर मालेगाव येथे उपचार सुरू होते.

या उंटांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राजस्थानच्या ‘सिहोरी’ येथील ‘महावीर कॅमल सॅनच्युअरी’ या संस्थेने स्वीकारली असून उंटांच्या राजस्थानपर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी धरमपूरच्या ‘श्रीमद राजचंद्र मिशन’ या संस्थेने घेतली आहे.