
बदलत्या जीवनशैलीचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मन निरोगी नसेल तर अर्थातच चेहऱ्यावरचे सौंदर्यही बिघडून जाते. मनासारख्या गोष्टी झल्या नाहीत की व्यक्ती आपला संयम गमावू लागते. तिच्यातील सहनशीलता संपते. संयम गमावल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याचा पुढील आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नसतो. जीवनात पुढे जाण्यासाठी व्यक्तीमध्ये संयम आणि सहनशीलता असणे खूप महत्त्वाचे आहे.
सहनशीलतेला जीवनात अत्यंत महत्त्व आहे. शरीराच्या सुंदरतेसाठी मनाची सुंदरता जपली पाहिजे. यासाठी आपल्या अंगी संयम असायला हवा. त्यासाठी चांगली झोप घ्या. जेव्हा झोप चांगली होत नाही, तेव्हा व्यक्ती तणावाखाली असते. तिला खूप थकवा जाणवत असतो. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरही राग येतो. मन शांत राहत नाही. संयमाची पातळी वाढवण्यासाठी शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे. ध्यान हा शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

अनेक वेळा खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकांची निराशा होते. संयमाची पातळी गमावण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत सकारात्मक राहणे फार महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संयमाने काम केल्यास यशाकडे वाटचाल करू शकाल. कोणत्याही गोष्टीचा तणाव घेवू नका. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा स्वभाव चिडखोर होतो. जे घडेल ते चांगलेच घडेल, असा दृष्टिकोन ठेवा. कोणतेही काम हुशारीने करा. त्यामुळे तुम्हाला यशही मिळेल.