
महाराष्ट्रातील गोव्याच्या अगदी जवळ असणारा एक स्वच्छ-सुंदर किनारा म्हणजे आरवली सागरकिनारा आहे. अरवली किनाऱ्यावर स्वच्छतेसह मनाला शांतता मिळते. हा किनारा सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात आहे. येथे रोज सकाळी स्थानिक मच्छीमार बांधवांची लगबग दिसते. येथेच स्थानिक मासळी बाजारसुद्धा भरतो. या किनाऱ्यावर काजू तसेच भाजलेल्या काजूपासून बनवलेल्या मिठाईचाही आस्वाद घेऊ शकता. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेल्या सोलकढीची चव चाखू शकता. आरवली समुद्रकिनाऱ्याच्या आसपासच्या काही प्रमुख आकर्षणांमध्ये रेडी गणेश मंदिर, तेरेखोल किल्ला यांचा समावेश आहे. रेडी शहरातील गणेश मंदिराला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. शिरोडा मिठागरसुद्धा पाहू शकता.

मोचेमाड सागरकिनारा आणि सागरेश्वरला देखील भेट देऊ शकता. येथून गोवा जवळ असल्याने गोव्याच्या सहलीचीही योजना करू शकता. या मोहक समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ डिसेंबर ते मार्च दरम्यान आहे. गोव्याचे मोपा आणि सिंधुदुर्गाचे चिपी ही सर्वात जवळची विमानतळे आहेत. हे ठिकाण रेल्वे मार्गाने देशातील प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. सिंधुदुर्ग आणि झाराप ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. अरवली समुद्रकिनाऱ्यालगत ‘ट्रेंडी हॉटेल्स’ किंवा ‘रिसॉर्ट्स’ सापडणार नाहीत. तथापि, परवडणाऱ्या किंमतीत आरामदायी मुक्काम देणारे तंबू रिसॉर्ट्स आणि ‘होम स्टे’ येथे उपलब्ध आहेत.