पालकांच्या प्रेमाने गहिवरले शिक्षक

”बदली हा नोकरीचा अविभाज्य भाग आहे. पण आपल्या सेवेचा असा आदर करणारे, आपल्यावर पोटच्या पोराप्रमाणे माया करणारे अन् शिक्षकाला आपल्या गावचा अभिमान मानणारे पालक भेटण्यासाठीसुद्धा खूप मोठे नशीब लागते. “शिक्षक म्हणून दिलेले प्रेम आणि माया हीच माझी आजवरची खरी कमाई आणि पुढील कामाची प्रेरणासुद्धा आहे. जगण्याचा सुंदर अनुभव माझ्या कासपाड्यातील गावकऱ्यांमुळे माझ्या नशिबात आला,” अशी प्रतिक्रिया बदली झालेले पालघर जिल्ह्यातील एक शिक्षक अजित गोणते या शिक्षकांनी दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा-कासपाडा येथे शिक्षक अजित गोणते १४ वर्षांपूर्वी रुजू झाले. या काळात शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. क्रीडा स्पर्धा आणि वक्तृत्त्व स्पर्धेत तालुका – जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रत्येक पालक आणि ग्रामस्थांच्या मनात घर केले. विद्यार्थी, पालक, त्याचप्रमाणे ग्रामस्थांशी अजित गोणते यांचे आपुलकीचे नाते तयार झाले.
कासपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतून १४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अजित गोणते यांची बदली झाली. त्यांच्या निरोप समारंभावेळी गावात एक अविस्मरणीय क्षण पहावयास मिळाला. ‘आमचे आदर्श शिक्षक, आमचा अभिमान’ असे फलक गावात लावण्यात आले. लाडक्या गोणते सरांची गावातील माताभगिनींनी आरती ओवाळत औक्षण केले. त्यांचा आदरसत्कार केला.

रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी उभे राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. आदिवासीच्या पारंपरिक ‘तारपा’ वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना शिक्षक, पालक, ग्रामस्थ भावूक झाल्याचे पहावयास मिळाले. आपल्याला मिळालेला सन्मान ,आपुलकी यामुळे निरोप देताना शिक्षक अजित गोणते यांनादेखील आपले अश्रू अनावर झाले. कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित गोणते सरांना सन्मानपूर्वक निरोप दिला.