पर्यावरणाबाबत दिशादर्शक काम पहायला मिळेल
”पर्यावरणाच्या दृष्टीने गावे स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल, पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे, येणाऱ्या काळात पर्यावरणाच्या माध्यमातून दिशादर्शक काम पहायला मिळेल,” असा विश्वास पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

‘जी २०’ अंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या पर्यावरण आणि हवामानविषयक शाश्वततेबाबत कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे औपचारिक उद्घाटन पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी ‘जी-२०’ देशांचे प्रतिनिधी, अतिथी देश,आंतरराष्ट्रीय संस्था तसेच सहभागी अतिथी राष्ट्रांचे स्वागत केले.

‘जी २०’ देशांनी संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांतून हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्परसंबंधित बाबींवर एकत्रितपणे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटातील प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हवामान बदल, जैवविविधता हानी, सागरी परिसंस्था, संसाधन कार्यक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यासाठी या कार्यगटाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.