
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे मन उल्हासित करणारे एक ठिकाण आहे. येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पक्ष्यांचे दर्शन होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी आहे. सन 1975 साली ‘नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान’ म्हणून शासनाने घोषित केले. ‘अरण्यऋषी’ नावाने प्रख्यात लेखक मारुती चितमपल्ली तसेच थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखनातून नवेगावचा निसर्ग भेटतो.

हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन येथे होते. नवेगावचा परिसर वनस्पती, वन्यजीव आणि पक्षी यांनी समृद्ध आहे. सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम आणि मोठा बगळा अशा पाणपक्ष्यांसोबत छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली हे छोटे पक्षी येथे आढळतात. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बुलबुल, सुतारपक्षी, हुदहुद, शिकरा, दयाळ, कोतवाल, सातबहिणी, ससाणा, गरुड, घुबड, घार असे पक्षी दिसून येतात. येथील वनस्पतीतही विविधता असून साग, बिजा, धावडा, पळस, कवट, बेल, बोर, मोह, बेहडा, हिरडा, उंबर, जांभूळ या वनस्पती येथे आढळतात. येथे पर्यटकांची राहण्याची सोय आहे. स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि वन्यप्राण्यांना बघण्यासाठी मार्च, मे महिन्याचा कालावधी योग्य आहे.