
समृद्धी महामार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी २६ मे रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘मुंबई ते नागपूर’ या ७०१ किमी. अंतराच्या समृद्धी महामार्गावर ‘शिर्डी ते भरवीर’ हा ८० कि.मी.चा दुसरा टप्पा आहे.

उद्घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे ‘शिर्डी ते भरवीर’ अंतर ४० ते ४५ मिनिटांत आणि ‘नागपूर ते भरवीर’ अंतर पावणे सहा तासांत कापता येईल. सध्या महामार्गावर ‘भरवीर ते इगतपुरी’ टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. बांधकामाच्या दृष्टीने हा टप्पा अवघड असल्यामुळे हा टप्पा पूर्ण होण्यास किमान 4 महिने लागतील. हा टप्पा दसरा-दिवाळीदरम्यान वाहतुकीस खुला होण्याची शक्यता ‘एमएसआरडीसी’ने व्यक्त केली. ‘मुंबई ते नागपूर’ या मार्गाचा ‘नागपूर ते शिर्डी’ हा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.