
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून गदारोळ सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. केंद्र सरकार राष्ट्रपतींचा अवमान करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यास सांगितले आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असे काँग्रेसने मंगळवारी सांगितले. पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या सोहळ्यापासून दूर ठेवून सरकारने त्यांचा आणि संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांगितले की, ते उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की संसद ही केवळ नवीन इमारत नाही. ही प्राचीन परंपरा, मूल्ये, उदाहरणे आणि नियम असलेली स्थापना आहे. हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनीही आपला पक्ष उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर आम आदमी पक्षाने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभात राष्ट्रपतींना निमंत्रित न करण्याबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न लक्षात घेऊन ‘आप’ने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडी, जेडीयू, डीएमके, शिवसेना, एनसीपी, सपाही या सोहळ्यावर बहिष्कार टाकू शकतात.