
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ‘शिवतीर्था’वर भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरे आणि भाजप – शिवसेना सरकारच्या भेटीगाठी वाढत असल्याने या रात्री उशिराने झालेल्या भेटीमुळे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांची भेट राजकीय नव्हती.” मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याचे कारण आणि संपूर्ण तपशील अजून समोर आलेले नाहीत.

गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी काही मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली होती. त्याला भाजपच्या नेत्यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्यानंतर मुंबई महापालिका व आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी याला दुजोरा दिला नाही. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.