
महाराष्ट्रात उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. ११ किमी. लांब आणि १.५ किमी. रुंद पसरलेले हे पठार आहे. हा किल्ला पुण्याहून ८५ किमी. अंतरावर, तर भोरवरून ३० किमी. अंतरावर आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. ने आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकतो.
रायरेश्वरावर शंकराचे मंदिर आहे. किल्ल्याच्या परिसरात अंदाजे ४० ते ५० घरे वसलेली आहेत. या पठारावर भात शेती केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात येथील दृश्य अजूनच विहंगमय होते. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.

शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती या रायरेश्वराच्या डोंगरावर, अशी एक काल्पनिक कथा येथे ऐकायला मिळते; पण निश्चित काही पुरावे सापडलेले नाहीत.
रायरेश्वराच्या किल्लावर राहायचे असल्यास या पठारावरील घरांमध्ये सोय केली जाते किंवा १० ते १२ जणं असल्यास रायरेश्वराच्या मंदिरातही निवासाची सोय आहे. या किल्ल्यावर पिण्याचे पाणी बाराही महिने उपलब्ध आहे.