भेंडीची शेती

महाराष्ट्रात भेंडीची लागवड अनेक जिल्ह्यांत केली जाते. भेंडीला ग्राहकांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे उत्पादन वर्षभर घेता येते. भेंडीमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते.

भेंडीचे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी शेतजमीन आवश्यक असते. किमान २० ते कमाल ४० अंश सेल्सिअसचे तापमान भेंडी पिकासाठी आवश्यक असते. खरीप आणि उन्हाळी हंगामात भेंडीचे उत्पादन अधिक येते.
नांगरून भुसभुशीत झालेल्या जमिनीत ५० गाड्या शेणखत मिसळून तिची कोळवणी केली जाते. शेतात तयार केलेल्या सऱ्यात 2 बिया रुजवाव्या. खरीप हंगामात हेक्टरी ८ किलो, तर उन्हाळ्यात हेक्टरी १० किलो बियाणे आवश्यक असते.

पूसा सावनी, सिलेक्शन २-२, फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का, अनामिका हे सुधारित वाण लागवडीस योग्य आहेत. दोन ओळींमध्ये येणाऱ्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोळपणी आणि निंदणी करणे गरजेचे असते.
भेंडीच्या पिकावर मावा, तुडतुडे, शेंडेअळी, लाल कोळी या किडींचा प्रादूर्भाव होतो. यासाठी दर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास याचा धोका कमी पोहचतो.