
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण मोकळा संवाद साधायला विसरत चाललो आहोत. अगदी आपला घरातील संवादही हरवत चालला आहे. त्यामुळे पाल्याच्या मनात येणारे प्रश्न पालकांपर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे कुटुंबावर होणारे परिणामही आपण पाहत आहोत.
पाल्य आणि पालकांनी दिवसभरातील एखादी ठराविक वेळ ही एकमेकांसोबतच्या संवादासाठी राखून ठेवली पाहिजे. जेणेकरून त्यावेळेत संवाद, चर्चा घडतील. मुलांच्या मनावरील ओझे पालकांना कळल्यास पालक त्यांना स्वानुभवातून काही मार्ग सांगू शकतात, पण त्यासाठी संवाद होणे आवश्यक आहे.

कोविड नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात रूढ झाली. त्यामुळे आई – बाबा हे दोघेही दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसायला लागले. मुलांची शाळाही ऑनलाइन असल्याने मुलेही दिवसभर आभासी जगात वावरत होती. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. मुलांच्या शाळा सुरू झाल्याने त्यांचे इतर विद्यार्थ्यांत मिसळणे, खेळणे, भांडणे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. विदेशी कंपनीमध्ये काम करणाऱ्या पालकांचे मात्र ऑनलाइन काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचदा पाल्य बाहेरून आल्यावरही पालकांचे त्याच्याकडे लक्ष नसते. ते नाराज आहे की आनंदी आहे ते बघायला वेळ नसतो. त्यामुळे पाल्यही पालकांशी संवाद साधायला जात नाही. ते मनातल्या मनात घुसमटत राहते.
काही पालक इतर पालकांच्या तक्रारीतून आपल्या पाल्याचीच चूक आहे असा समज करून घेतात. त्यामुळे आपले मूल आपल्याला काय सांगत आहे हे समजून न घेता घडलेल्या प्रसंगात आपल्याच पाल्याची चूक कशी झाली असणार हे सतत त्याच्यावर लादतात. त्यामुळे काहीही घडल्यावर आई – वडील पाल्याला ओरडतात हा समज तयार होतो आणि पाल्य – पालक संवाद तुटतो. त्यामुळे पालकांनी सर्वांत प्रथम आपल्या पाल्याची बाजू ऐकून घेऊन त्यावर विश्वास ठेवून मग चर्चा केली पाहिजे.
या तुटत चाललेल्या संवादावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे एकमेकांना वेळ द्या. एकमेकांची मते जाणून घेऊन त्यावर विचार करा. कुटुंबात चर्चा घडू द्या. त्यातून तुटलेल्या विसंवादाला संवादाचे स्वरुप प्राप्त होईल. तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून माणुसकीच्या संवादात्मक जाळ्यात एकमेकांना अडकवण्याची वेळ जवळ आली आहे.