लिची लागवड
उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत आहेत.
लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे भारतात उन्हाळ्याच्या दिवसांत लिची हमखास बाजारपेठांमध्ये दाखल होते. लिचीमध्ये ‘बी ६’ जीवनसत्त्व, ‘क’ जीवनसत्त्व, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही आढळतात. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपले शरीर थंड ठेवायला मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अतिसार टाळता येतो, उष्माघातापासून रक्षण होते, पचनसंस्था सुद्धा निरोगी राहते.

लिचीची लागवड पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या कालावधीत करतात. हवामान कोरडे असताना लिचीची लागवड केल्यास तिला फळे जास्त लगडतात. एप्रिलमध्ये वातावरणातील आर्द्रता सामान्य असल्याने फळाला भरीव असा गर येतो आणि अधिक गुणवत्ता असलेली फळे आपल्याला मे महिन्याच्या आसपास चाखायला मिळतात.
लिचीला पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. लिचीची साधारपणपणे २ वर्षांची झाडे लागवडीसाठी निवडली जातात. लिचीची झाडे एकमेकांपासून 10 x 10 अंतर राखून लावली जातात. रोपाला आकार देण्यासाठी सुरुवातीच्या काळात कापणी आवश्यक असते. त्यानंतर विशेष कापणी करावी लागत नाही. फळ काढल्यानंतर नवीन फांद्या तयार करण्यासाठी हलकी छाटणी आवश्यक असते.
लिचीच्या झाडाची संपूर्ण वाढ होऊन फळ लागायला सुरुवात होण्यासाठी किमान ७ वर्ष लागतात. त्यामुळे त्या दरम्यान तुम्ही शेतात आंतरपीक घेऊ शकतात.

लिचीची फळे तोडताना ती डहाळ्या आणि पानांसकट तोडली जातात. लिची हे फळ जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे पूर्ण पिकल्यानंतर ते तोडतात; पण जर निर्यात करायची असेल, तेव्हा मात्र फळ गुलाबी झाल्यावरच झाडावरून उतरवले जाते. सुरुवातीला लिचीपासून अत्यल्प नफा मिळतो. झाडाचे वय १५ ते २० वर्ष झाल्यावर दरवर्षी १०० किग्रॅ. फळे आपल्याला मिळतात. ‘ए’ दर्जाची १० किलो लिची अंदाजे १७०० रुपयांपर्यंत विकली जाते.