
आपल्या मातीतील प्रश्नांची आणि ती सोडवण्याच्या निकडीची जाणीव करून देणारा चित्रपट म्हणजे ‘स्वदेस’. हा चित्रपट जिथे अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला तिथे याचे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि जरीना स्क्रूवाला शांत कसे बसतील! स्क्रूवाला दांपत्य हे १९८३ पासूनच गावोगावी परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत होते. त्यांच्या SHARE म्हणजेच Society to Heal Aid Restore Educate ह्या संस्थेच्या मार्फत त्यांनी रायगड जिल्ह्यात आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यांच्या कार्याचीच ही कहाणी.
‘गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही’ ह्या एका विचाराने झपाटलेल्या स्क्रूवाला दांपत्याने आपल्या ‘SHARE’ ह्या संस्थेच्या माध्यमातून गावोगावी अनेक कार्यक्रमांना सुरुवात केली. पाण्याची कमतरता असलेल्या गावांसाठी पाण्याची सोय करून दिली गेली. अशात आर्थिक चणचण भासू लागल्याने स्क्रूवाला दाम्पत्याने त्यांची ‘युनायटेड टेलीविजन’ ही कंपनी विकून ‘SHARE’ याच संस्थेचं नामांतर 2013 साली ‘स्वदेस फाउंडेशन’ असे केले. खेड्यापाड्यात आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता, आर्थिक विकास – गाव विकास ह्या चार बाबींवर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड ह्या सात तालुक्यांमध्ये काम सुरु केले.
हे काम सुरु करताना स्वदेसकर्त्यांनी 5 ते 6 वर्षात 10 लाख लोकांच्या जीवनमानात बदल घडवून आणणे आणि प्रत्येक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखावर गेले पाहिजे हे ध्येय ठरवले. त्यासाठी गावकऱ्यांचा खर्च कमी करण्यावर भर दिला. आरोग्यावर विशेषत: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी गावातच जास्तीत जास्त उपचार मिळावेत म्हणून ‘स्वदेस’ने ‘मोबाईल व्हिजन केअर व्हॅन’ तयार केली. ही व्हॅन गावोगावी जाऊन लोकांच्या डोळ्यांची तपासणी करते. गरजूंना लगेच चष्मे दिले जातात. ‘स्वदेस मित्र’ म्हटल्या जाणाऱ्या गावातील प्रशिक्षित स्त्रिया स्वत: प्रथमोपचार करतात, तर मोतीबिंदूच्या रुग्णांना नेत्र चिकित्सकांना दाखवण्यासाठी व्हॅनमध्ये आणतात. ह्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे आणि मुंबई इथल्या रुग्णालयात पाठवले जाते. आजवर ‘स्वदेस’ने 19 हजार शस्त्रक्रिया करून दीड लाख चष्म्यांचे वाटप केले आहे.
हृदयाला छिद्र असणारी अकरा वर्षे वयोगटातील किमान २५० मुले स्वदेसच्या कार्यकर्त्यांना आढळून आली. स्वदेस स्वत: संपूर्ण खर्च करून अशा रुग्णांना फोर्टीस, वॉकहार्ट, ज्युपिटर ह्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करते. स्वदेसचे काम पाहून महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यात अशा प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. ह्या करारा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची टीम स्वदेस सोबत काम करू लागली.

स्वदेसने रायगड जिल्ह्यात 54 हजार घरात प्रत्येकी दोन नळ बसवून दोनशे लिटर रोज शुद्ध पाणी पोहोचवले आहे. ‘SHARE’ च्या माध्यमातून आधीपासूनच सुरु असलेल्या शौचालय उभारणीच्या कामाला भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ने गती आली. स्वदेसने 27 हजार शौचालये दक्षिण रायगड मधील १९२६ गावांमध्ये बांधून दिली. यामुळे दक्षिण रायगड हागणदारी मुक्त होऊन अनेक ग्रामपंचायतींना राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कारही मिळालेला आहे. इथे ३५० पाणी योजना या सौरऊर्जेवर आधारित सुरु आहेत. नाशिकमध्ये सुद्धा इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगणा ह्या तालुक्यांमध्ये ६०० शौचालये बांधली गेली आहेत.
कोरोना काळात शासनाने लोकांच्या लसीकरणासाठी स्वदेसची मदत घेतली. स्वदेसने 23 मोबाईल रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. किमान 5 लाख सिरींज उपलब्ध करून दिल्या. नाशिकमधील 11 तालुक्यात किमान 1 लाख दहा हजार लोकांचे लसीकरण केले. यासोबतच स्वदेसने व्हेन्टिलेटर, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी 7 रुग्णवाहिका नाशिकमध्ये, 7 रायगडमध्ये, तर प्रत्येकी एक सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरला दिल्या आहेत.
‘स्वदेस’ने रायगड मधील शाळांमध्ये पाणी, शौचालय, प्रयोगशाळा, संगणक आणि शिक्षक प्रशिक्षण केंद्र, नकाशांचे कीट, ग्रंथालय, दहावी आणि बारावी नंतर उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा सुविधा दिल्या आहेत. दरवर्षी एक्सलंस स्कॉलरशिप आणि विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. याद्वारे 399 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला. साधारणपणे वर्षाला 3,50,000 पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
‘स्वदेस’ने १० लाखांहून अधिक झाडे लावली आहेत, तर विविध सौरऊर्जा प्रकल्पांमुळे दररोज १८०० किलो वॅट सौरऊर्जा तयार होत आहे. वार्षिक 2 लाख रुपयाचे ध्येय गाठण्यासाठी डेरी प्रकल्प, शेळी पालन, पोल्ट्री फार्म, शेती, 16 विविध कौशल्य प्रशिक्षण अशा प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात. ह्या योजनांच्या माध्यमातून ‘स्वप्नातील गाव’ ही संकल्पना राबवल्यामुळे गावकरी महिन्याला 40 ते 50 हजार रुपये कमवू लागले आहेत. त्यामुळे गावातून बाहेर गेलेले लोक पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत. ‘स्वदेस’चा हाच तर उद्देश होता आणि आहे. तो आता सफल होताना दिसतो आहे!