गहू लागवड

‘गहू’ हे जगभरातील महत्त्वाचे पीक आहे. भारतातील गव्हासाठीचे एकूण क्षेत्रापैकी सुमारे ३० टक्के क्षेत्र हे बागायती असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. गहू पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. गव्हाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान मानवते. गव्हाची मशागत करताना जमीन भुसभुशीत असणे विशेष आवश्यक आहे. कुळवणी करताना त्यात भरपूर प्रमाणात शेणखत पसरवायचे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या पिकाचा काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करणे गरजेचे आहे.

बागायती गव्हाची पेरणी शक्यतो नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होणे चांगले असते. त्यानंतर लागवड केल्यास उत्पादनात घट होऊ शकते. पेरणी करताना दक्षिणोत्तर केली जाते. दोन पिकांमधील अंतर २० सेंमी. ठेवलेले असते. पेरणी करताना बियाणे ६ सेंमी. खोलवर रुजवतात. त्यामुळे गव्हाच्या मुळांना वाढायला वाव मिळतो.
हलक्या किंवा मध्यम जमिनीतील लागवड, हवामानातील बदल, आवश्यकतेपेक्षा कमी खतांचा वापर, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर केलेली पिकाची लागवड, योग्य प्रतीचे बियाणे न वापरणे यांसारखे इतर काही कारणांमुळे गव्हाचे उत्पादन कमी होते.
कोरडवाहू लागवडीमध्ये पंचवटी, नेत्रावती; तर बागायतीमध्ये त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, फुले समाधान, एम. ए. सी. एस. 6222, एम. ए. सी. एस. 6478; बागायती उशिरा पेरणीमध्ये एन. आय. डी. डब्लू. ३४, ए. के. ए. डब्ल्यू. 4627, ए. के. ए. डब्ल्यू 4210 ही वाणे प्रसिद्ध आहेत.

माती परीक्षणाद्वारे आपण नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा योग्य मारा केल्यास उत्पन्नात वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे मुबलक पाणी योग्य वेळी दिल्यास आपल्याला उत्पादनाचा पोत सुधारलेला जाणवतो. पण जर जादा पाणी शेताला पाजल्यास उत्पादनात घट झालेली दिसते.
उंदीर, मावा, कीड या रोगांचा धोका गव्हाच्या पिकाला असतो. त्यामुळे पीक संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक किंवा रासायनिक औषधांचा वापर करावा. त्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही.