
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यादिवशी ‘इंद्रायणी’ काठी वैष्णवांची मांदियाळी जमली होती. अपार भक्तीभावाने ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजराने अवघी आळंदी दुमदुमून गेली होती. प्रस्थानावेळी वारकरी, टाळकरी यांनी ठेका धरला होता. हा नयनरम्य आणि भव्य सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांचीही गर्दी बघायला मिळाली.

पायी प्रवास करुन २८ जूनला ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल. २९ जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायाशी भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. या सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करीत असतात.
श्रींचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस पाहुणचार घेणार आहे. १४ जूनला सासवड मुक्कामास राहून दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होणार आहे. १५ जूनला सासवडला मुक्काम करेल. १६ जूनला जेजुरीकडे प्रस्थान, १७ जूनला जेजुरीला मुक्काम असेल. १८ जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. १९ जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि २० जूनला तरडगाव, २१ जूनला फलटणकडे प्रस्थान करेल. २२ जूनला पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल. २३ जूनला नातेपुते, २४ जूनला माळशिरस, २५ जूनला वेळापूर, २६ जूनला भंडी शेगाव, २७ जूनला वाखरी येथे, मुक्काम असेल. २८ जूनला पंढरपूरला पोहोचून २९ जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.