महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ  

‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ’ अर्थात ‘बालभारती’ ही राज्य शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली संस्था आहे.  राज्यातील शैक्षणिक विकास आणि संशोधन करणारे हे एक  मंडळ आहे.  २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे या मंडळाची स्थापना करण्यात आली. ‘बालभारती’ या नावाने ती ओळखली जाते. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम या मंडळाच्या ‘विद्या’ विभागात चालते. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशी शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने (१९६६) केली होती. त्यानुसार या मंडळाची स्थापना झाली. हे मंडळ ही एक सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे.  विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके, शिक्षकांसाठी हस्तपुस्तके आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणविषयक इतर साहित्य तयार करणे,  प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या इतर शाखांसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती करणे, साहाय्यभूत आणि इतर शिक्षणसाधने यांवरील साहित्याविषयी संशोधन करणे,  शासनाच्या वतीने पाठ्यपुस्तके मोफत पुरविण्याविषयीची योजना कार्यान्वित करणे ही कामे या मंडळामार्फत केली जातात. या मंडळात ‘विद्या विभाग’, ‘सामान्य प्रशासन विभाग’, ‘वितरण विभाग’, ‘वित्त विभाग’, ‘अंतर्गत-लेखापरीक्षण विभाग’, ‘निर्मिती विभाग’, ‘संशोधन विभाग’, ‘ग्रंथालय विभाग’, ‘किशोर विभाग’ हे विभाग असतात.
मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथील ‘बालभारती’ नामक इमारतीत आहे.  याशिवाय पुणे, नागपूर, मुंबई (गोरेगाव) आणि औरंगाबाद या ४ ठिकाणी मंडळाची पाठ्यपुस्तक-भांडारे आणि वितरण केंद्रे आहेत. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी मंडळाकडे नोंदणी करून क्रमिक पुस्तकांची मागणी केल्यास पुस्तक-विक्रेत्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थांना पुस्तकांच्या खरेदी किंमतीवर सवलत देतात. राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण संचालक हे मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. नियामक मंडळावर या दोघांसह 9 पदसिद्ध आणि 6 अपदसिद्ध सदस्य असतात. अपदसिद्ध सदस्यांची नियुक्ती शासनातर्फे सर्वसाधारणपणे दर 3 वर्षांनी होते.
मंडळाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार अधिक समित्या आणि उपसमित्या नियुक्त करण्याचे अधिकार नियामक मंडळास आहेत. अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, इंग्रजी या भाषा विषयांच्या एकूण ७ समित्या आहेत. इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र या भाषेतर विषयांसाठीही समित्या आहेत.
हे मंडळ अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या ४ वर्षांच्या कालावधीत इयत्ता सातवीपर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली. १४ नोव्हेंबर, १९७१ पासून ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ हे मासिक मंडळाने सुरू केले. त्यातील उत्तम साहित्याचे १४ खंड प्रकाशित झाले आहेत.
या मंडळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले. मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली. मंडळाचे पहिले संचालक म्हणून उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक म्हणून शिक्षणतज्ज्ञ बापूराव नाईक हे होते. आठ भाषातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे ‘बालभारती’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंडळ आहे.




Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *