गणेशोत्सवासाठी कल्याण आगारातील बसगाड्या सज्ज
गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. कल्याण आगाराकडून कोकणात जाण्यासाठी बसगाड्या सोडण्यात येणार असून आतापर्यंत ४४ बसगाड्यांचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक पातळीवर बसगाडी आरक्षणाची मागणी अखेरच्या टप्प्यात नोंदवली जाण्याची शक्यता एसटी व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी राजकीय पक्षांकडून ३०० बसगाड्यांचे आरक्षण करुन त्या प्रवाशांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात राहणारा चाकरमानी गणपतीला गावी जातो. गणपतीच्या सात ते आठ दिवस आधी गावी पोहोचून उत्सवाची तयारी केली जाते.
मागील वर्षी कल्याण-डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्यांसाठी ३०० बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. आतापर्यंत राजकीय पक्षाकडून आरक्षणासाठी विचारणा होत आहे; मात्र आरक्षण नोंदविण्यात आलेले नाही. प्रवाशांनी एसटीचे आगाऊ आरक्षण केले असून आतापर्यंत ४४ बसगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यंदा ३०० ते ३५० गाड्यांची मागणी अखेरच्या टप्प्यात होण्याची शक्यता एसटी महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे. शेवटच्या १० दिवसांत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बसगाड्यांची मागणी केली जाऊ शकते.