गुरांमधील ‘लम्पी’ आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्हा हा ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथीच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव नियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये या चर्मरोगामुळे ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री, बाजार आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील ‘लम्पी’ चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.