महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

राज्यातील पर्यटन समृद्ध करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. ही राज्यातील एक सरकारी संस्था आहे. या महामंडळामार्फत अनेक नवनवे उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना सन १९५६ च्या कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आली. या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अलीकडे पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अनेकजण विरंगुळा, अभ्यास, नव्या जागा पाहण्याची आवड, भ्रमंती असे काही उद्देश समोर ठेवून पर्यटनावर भर देत आहेत. या महामंडळाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

पर्यटकांना महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यांमध्ये भ्रमंती करुन आणण्यासाठी महामडळामार्फत सहलींचे आयोजन करण्यात येते. मुंबई व पुणे येथून दैनंदिन किंवा काही दिवसांची तसेच मोसमी सहलींची व्यवस्था करण्यात येते. इतर राज्यांतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी, तसेच पर्यटक-समूहांसाठी त्याच्या इच्छेनुसार सहली आयोजित केल्या जातात. या सहलींसाठी महामंडळाच्या मालकीच्या आरामदायक बसगाड्या, वातानुकूलित बसगाड्या व प्रवासी टॅक्सी-गाड्या उपलब्ध असतात. महामंडळाचे राज्यात स्वत:चे पर्यटक निवास, हॉटेल्स व उपाहारगृहे आहेत. महाराष्ट्रात पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी महामंडळाने पर्यटक निवास बांधले आहेत. पर्यटन महामंडळ कागद, धातू, लाकूड, काच, कापड इत्यादींपासून आकर्षक वस्तू तयार करून त्यांची विक्री करते. यांना पर्यटकांकडून चांगली मागणी असते.

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणांची माहिती प्रसारित केली जाते. निरनिराळ्या प्रकारचे माहिती असणारे साहित्य, चित्रपट, माहितीपट करुन ते प्रसारित केले जातात. महामंडळ राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभागी होते. यात महामंडळाला पारितोषिकेही मिळाली आहेत. महाराष्ट्रात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. मात्र या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना असणे आवश्यक आहे. त्याकरिता पर्यटन महामंडळाची भूमिका महत्वाची आहे. अलीकडे, पर्यटन हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही फार महत्वाचे ठरत आहे. दरवर्षी पर्यटन हंगामात प्रचंड उलाढाल या व्यवसायामुळे होते. त्यामुळे राज्यातील पर्यटन वाढविण्यासाठी हे महामंडळ महत्वाचे आहे. यासाठी महामंडळ अनेक नवे उपक्रम राबवून त्यासाठी गुंतवणूकही वाढवीत आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *