महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद ही तत्वज्ञानविषयक अभ्यास करणारी, विचारमंथन घडवून आणणारी महाराष्ट्र राज्यातील एक संस्था आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’ पुणे येथील सभागृहात झाले. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद स्थापन करण्यासाठी २ नोव्हेंबर १९८० रोजी कोल्हापूर येथे हिंदकन्या छात्रालयात सभा झाली. या सभेचे प्रा. ज.रा. दाभोळे हे निमंत्रक होते. या सभेत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते असे ३० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी परिषद स्थापन करण्यासंदर्भात विचारमंथन झाले. त्यानंतर परिषद स्थापनेच्या पूर्वतयारीसाठी व घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली.
या सुकाणू समितीची पहिली बैठक २८ डिंसेबर १९८० रोजी स.प. महाविद्यालय,पुणे येथे झाली. तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. श्रीनिवास हरी दीक्षित हे या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. या बैठकीत परिषदेचे नाव ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’ असे ठरविण्यात आले. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेमार्फत दरवर्षी एक अधिवेशन आयोजित केले जाते. परिषदेचे पहिले अधिवेशन मे १९८४ साली झाले. रौप्यमहोत्सवी अधिवेशन सन २००८ साली झाले. रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने या परिषदेने ‘तत्त्ववेध’ ही स्मरणिका प्रकाशित केली.
महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेची २०१४ नंतर काही अधिवेशने झाली आहेत. परिषदेच्या संकेतस्थळावर त्याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे येथील सभागृहात २० व २१ नोव्हेंबर १९८२ रोजी झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या स्थापना अधिवेशनात तीन विषयांवर परिसंवाद झाले होते. ‘नैतिक मूल्यांवरील भारतीय चिंतन’ या विषयावर पहिला परिसंवाद झाला होता. ‘सामाजिक न्याय’ हा दुसरा व ‘स्वातंत्र्याची संकल्पना’ हा तिसरा विषय होता. या अधिवेशनांमध्ये विविध विषयांवर तत्वज्ञांचे परिसंवाद, व्याख्याने आयोजित केली जातात. विचारमंथन घडवून आणले जाते. या अधिवेशनाला विचारवंतांची उपस्थिती असते. वैचारिक अधिष्ठान असलेल्या या परिषदेचे प्रबोधन, जनजागृती यामध्ये मोलाचे योगदान आहे.