अंगणवाडी मदतनीस साठी उच्चशिक्षितांचे अर्ज
सरकारी नोकरी प्रत्येक उच्चशिक्षिास हवी असते. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर झाल्यावर हजारो-लाखोंच्या संख्येत अर्ज भरले जातात. अलीकडे सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेत सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने कोणत्याही सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. असेच उदाहरण नुकतेच नागपूर जिल्ह्यात आढळून आले. नागपूरमध्ये २,२०० च्या जवळपास अंगणवाड्या कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात मदतनिसांच्या २८८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी एमएस्सी, एमएड, इंजिनीअर असलेल्या महिला उमेदवारांनी अर्ज केल्याची बाब छाननीअंती समोर आली.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात २,२१२ अंगणवाड्या आहेत. येथे शून्य ते सहा वर्षे वयोगटातील लाखो बालकांचे संगोपन केले जाते. मुलांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी ठेवल्या जातात. स्तनदा मातांबरोबर गर्भवती, किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. जिल्ह्यातील २८८ केंद्रांमध्ये मदतनिसांची पदे रिक्त होती. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने भरती प्रक्रिया राबविली.
मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण पात्रता व स्थानिक महिला उमेदवारांना प्राधान्य अट होती. तालुका बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे एका जागेसाठी चार ते पाच अर्ज आले. यात उच्चशिक्षित महिला उमेदवारसुद्धा असल्याचे समोर आले. अंगणवाडी मदतनीसांना दरमहा केवळ साडे पाच हजार रुपये तर सेविकांना १०,३०० रुपये मानधन दिले जाते. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी नोकरी म्हणून उच्चशिक्षितांची पसंती या पदाला मिळत आहे. केवळ नागपूरच नव्हे, तर सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते.