महाराष्ट्र साहित्य परिषद अर्थात ‘मसाप’ या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी झाली. चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय सुरुवातीला पुण्यात ‘मळेकरवाडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत होते. त्यानंतर ते टिळक रोडवर नव्याने बांधलेल्या इमारतीत आले. सध्या या इमारतीत माधवराव पटवर्धन सभागृह, कै.वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय आहे. इमारतीच्या तळघरात खासगी संस्थांची पुस्तक प्रदर्शने भरविली जातात. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारच्या सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, तरुण मंडळीच सभासद होतात.
दिनांक २९ नोव्हेंबर १९४१ रोजी माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. या सभागृहातील भिंतींवर सभागृहाच्या दर्शनी भागात लावलेले आणि नि.म. केळकर यांनी रेखाटलेले माधवराव पटवर्धन यांचे तैलचित्र आहे. त्याशिवाय भिंतींवर आजवरच्या सर्व साहित्य संमेलनाध्यक्षांची सारख्याच आकाराची छायाचित्रे लावली आहेत. मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात मसापच्या ६५ शाखा आहेत. ‘मसाप’च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गाव आणि परदेशातही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यात आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांमध्ये परिषदेच्या ३५० शाखा आहेत. जवळपास १२ हजार सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी- साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. महाराष्ट्र साहित्य परिषदेला घटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर सन १९१२ मध्ये अकोला येथे झालेल्या संमेलनामध्ये परिषदेचे मुखपत्र असावे, हा निर्णय घेण्यात आला. परिषदेतर्फे सन १९१३ मध्ये ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे मुखपत्र सुरू करण्यात आले. सुरुवातीची बारा वर्षे हे मुखपत्र मासिक स्वरूपात निघत होते. ‘विविध ज्ञानविस्तार’ या मासिकाबरोबर वितरित केले जात होते. महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था आहे.