पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल अशी गतिशील परिसंस्था विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला ‘अमृत काल’ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे सुचविले. वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात, ‘सियाम’ च्या वार्षिक परिषदेत पंतप्रधान मोदींनी आपला संदेश पाठविला.
मोदींनी देशाच्या वाढीमध्ये वाहन उद्योगाची भूमिका मान्य केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, आजच्या भारतात, विविध स्वरूपातील गतिशीलता हा विकासाचा प्रमुख चालक आहे. कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर पडून त्यांनी नव-मध्यम वर्गात प्रवेश केल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक गतिशीलता येते.
‘सियाम’चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी कार्यक्रमाला उपस्थित लोकांसमोर पंतप्रधानांचे भाषण वाचून दाखवले. त्यात मोदी म्हणाले, की ते त्यांच्या आकांक्षांद्वारे देशाच्या विकासाला चालना देतात. ते आपल्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्यास सामर्थ्य देतात. यामुळे भारत दहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. लवकरच आम्ही पहिल्या तीन क्रमांकावर पोहोचण्यासाठी सज्ज आहोत.”
ते म्हणाले की, ऑटोमोबाईल उद्योगाने कोट्यवधी लोकांना रोजगार देऊन उत्पन्नवाढीस हातभार लावला आहे. इथेनॉल, फ्लेक्स फ्युएल, सीएनजी, बायो-सीएनजी, हायब्रीड इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन यासारख्या अनेक पर्यायी तंत्रज्ञानाचा हवाला देऊन कार्बन उत्सर्जन आणि तेल आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू ठेवण्याच्या आणि वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी जोर दिला.