आनंदी जीवनासाठी जागतिक शांतता गरजेची
माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. साधु वासवानी मिशन, पुणे यांच्या वतीने दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल पुढे म्हणाले की, व्यक्तीची आंतरिक शक्ती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाची स्थिती आहे.
दादा वासवानी यांच्याविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, आपल्या प्रवचन आणि लेखाद्वारे देश-विदेशातील लाखो लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. शांती आणि सद्भावनेचे ते दूत होते. ‘साधु वासवानी मिशन’च्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि अन्य सेवाकार्य उभे केले. यावेळी ‘नर्क से स्वर्ग तक’ या हिंदी आणि ‘स्वतः सक्षम बना’ या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशनही राज्यपालांनी केले.