महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे. खादी व ग्रामोद्योगांना उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सन १९६० मध्ये स्थापना झाली. हे मंडळ ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर काम करते. सेवा संघटना या स्वरूपातील हे मंडळ आहे. राज्यातील खादी उत्पादन तसेच अधोगतीच्या दिशेने चाललेल्या इतर २२ उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांची पुनर्बांधणी करण्याची विशिष्ट जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाने बंद पडण्याच्या मार्गावरील काही व्यवसायांचे पुनरुज्जीवन करून त्यांना चांगल्या स्थितीत आणण्याची मोठी कामगिरी केली आहे.

मंडळाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य सबंध देशात चामडे, मातीची भांडी, हातबनावटीचे कागद, बांबू व वेतकाम, तेल गाळणे या ग्रामीण उद्योगांत अग्रेसर आहे. याव्यतिरिक्त हे मंडळ खादी, पॉलिएस्टर खादी, लोकर, रेशीम, नीरा, साधा व ताडीचा गूळ, धान्ये व डाळी ह्यांवर प्रक्रिया, अखाद्य तेले व साबण, मधमाशा पाळणे, खडूच्या कांड्या, फळांवर प्रक्रिया व डबाबंद करणे, सुतारकाम, लोहार काम, ॲल्युमिनियमची भांडी, औषधी वनस्पती, डिंक, आगपेट्या, काथ्या, लाख व गोबर-वायू संयंत्रे इ. उद्योगांना सहाय्य करते.

ग्रामीण कारागीरांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण व आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यांना हत्यारे व साहित्य पुरविणे, त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यास मदत करणे, यांसाठी मंडळ अनेक विक्री केंद्रे चालविते. प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देते. संशोधन करुन ग्रामीण उद्योगांच्या उत्पादनात सुधारणा घडवून त्यांची उत्पादकता वाढविते. कारागिरांसाठी इतर सामग्री तसेच कर्ज मिळवून देते. भारतात खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. भारत सरकारच्या ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोग अधिनियम 1956’ अंतर्गत स्थापना करण्यात आली. ही भारतातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या संदर्भात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी ही एक सर्वोच्च संस्था आहे. महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाने प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमुलाग्र बदल घडविणे हे या मंडळाचे ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अनेक योजना आहेत. यांचा लाभ ग्रामीण भागातील कारागिरांना होतो.

ही संस्था ग्रामोद्योगांची स्थापना करते. विकासासाठी योजना राबवून प्रोत्साहन देते. अशा उद्योगांना संघटित करुन सहाय्य करण्याचा प्रयत्न करते. ग्रामीण भागात आवश्यक तेथे ग्रामीण विकासाशी संबंधित इतर संस्थांच्या समन्वयाने कार्य करते. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे, तर दिल्ली, भोपाळ, बंगळुरु, कोलकाता येथे सहा विभागीय कार्यालये आहेत. संस्थेच्या विभागीय कार्यालयांव्यतिरिक्त, विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अन्य राज्यांमध्येही कार्यालये आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *