विजयादशमी

हिंदू धर्मामध्ये दसरा अर्थात विजयादशमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. त्यादिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. या सणानिमित्त नवे कपडे, सोने-चांदी खरेदी केली जाते. विजयादशमीला घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची तोरणे बांधतात. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे, म्हणजेच आपट्याची पाने काढून देवाला वाहतात.
याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभु रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर ती परत घेऊन त्या झाडाची पूजा केली. विजयादशमी हा सण भारत व नेपाळमध्ये नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जातो. याला दसरा, दशहरा या नावानेही ओळखले जाते. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते.
विजयादशमीनंतर वीस दिवसांनी दिवाळी येते. दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी ‘अपराजिता’ देवीची पूजा करतात. काही गावात दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच सोन्याचीही खरेदी होते. भारतातील वेगवेगळ्या भागात विजयादशमी उत्साहाने साजरी करतात. वेगवेगळ्या पारंपरिक प्रथांचे पालन केले जाते. विजयादशमीच्या आधी नऊ दिवस नवरात्र सोहळा उत्साहाने साजरा करतात. या सोहळ्यानिमित्त भक्तीभावाचे उधाण आलेले असते.