बाणगंगा तलावात माशांचा मृत्यू
आकस्मिकपणे जलाशयांमधील जलचर मृत होण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. मनुष्याची कृती यासाठी कारणीभूत ठरत आहे. मुंबईत वाळकेश्वर परिसरातील ‘बाणगंगा’ तलावात असा प्रकार घडला आहे. या तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत झाले आहेत. जवळपासच्या रहिवाशांनी सर्वपित्री अमावस्येला धार्मिक विधी केल्यानंतर पिंडदान केलेल्या पिठाचे गोळे व पूजाविधीनंतरचे साहित्य या तलावात विसर्जित केले. यामुळे मोठ्या संख्येने पाणी दूषित होऊन मासे मृत पावत आहेत. मृत माशांमध्ये लहान माशांसह एक ते दीड फुटांच्या माशांचा समावेश आहे. शेकडो मासे मृत पावल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
पितृपक्षात पितरांचे पूजाविधी करण्यासाठी या तलावात मोठ्या संख्येने मुंबई व इतर भागांतील नागरिक येत असतात. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशीही धार्मिक विधींसाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी निर्माल्य, पिंड आणि इतर साहित्य थेट तलावात टाकले गेले. यामुळे पाणी दूषित झाले. तलावाचे पाणी स्थिर असल्यामुळे सर्व साहित्य साठून राहिले. पाण्यावर तेलाचे तवंग तयार झाले. परिणामी, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या तलाव परिसरात अस्थी विसर्जन व पितृपक्षात धार्मिक विधी केले जातात. मासे मृत होण्याचा प्रकार दुर्दैवी असून यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी दखल घेण्याची गरज पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.