कागदी लिंबू शेती

कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम असते. ही लिंबे लोणच्यासाठी वापरली जातात. या झाडाला काटे असले तरी ते अगदी लहान असतात. काही लिंबांचा आंबटपणा कागदी लिंबाच्या तुलनेत किंचित कमी आहे. कागदी लिंबू हे महत्त्वाचे लिंबूवर्गीय फळ असून महाराष्ट्रात या फळपिकाखाली ३०,३२८ हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, योग्य जमीन आणि ओलिताची उपलब्धता लक्षात घेता या फळपिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. कागदी लिंबू या फळपिकास उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. कमी ते मध्यम पर्जन्यमान असलेल्या भागात या झाडाची यशस्वीपणे लागवड करता येते. कागदी लिंबू बहुवर्षायू फळझाड असल्याने जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी व ६.५ ते ८.० सामू असलेली जमीन लिंबू लागवडीकरिता निवडावी. अतिभारी, पाणथळ, चोपण, रेताड व खडकाळ जमीन लिंबू लागवडीसाठी योग्य नाही.
महाराष्ट्रात ‘कागदी लिंबू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक जातीचीच लागवड केली जाते. लिंबू प्रजातीच्या लागवडीसाठी जून, जुलै आणि डिसेंबर, जानेवारी ही योग्य वेळ आहे. ‘कागदी काला’ ही खूप जुनी जात आणि ‘पुसा लिंबू वन’ ही अलीकडची जात आहे. जुलै आणि ऑगस्ट हे महिने लागवडीसाठी सर्वोत्तम काळ मानले जातात. या झाडाच्या लागवडीसाठी एक घनमीटरचा खड्डा खणणे आवश्यक आहे. त्यानंतर 10-15 दिवस सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत खड्ड्यात मिसळून ते भरावे. जुलैचा पहिला पाऊस येताच सुमारे 4 ते 4.5 मीटर अंतरावर ही रोपे लावावीत. सुरुवातीच्या एक ते दोन वर्षात लिंबाबरोबर अन्य पिकेही घेऊ शकता. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पन्न मिळण्यासाठी लिंबाच्या झाडांचे खोड मजबूत होणे आवश्यक आहे. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी व हवा खेळती राहण्यासाठी झाडांना वळण देणे आवश्यक आहे.
पहिली दीड वर्षे कसलीच छाटणी करू नये. रोपे दोन वर्षांची झाल्यावर वळण द्यावे. त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी. रोपांना नियमित पाणी द्यावे. तसेच औषध फवारणी करावी. लिंबाच्या लागवडीसाठी सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात फळे तडकायला लागतात, आणि पाने जळू लागतात. लिंबू लागवड करताना एप्रिल-मे महिन्यात गवत पूर्णपणे काढून टाकावेत. लिंबाची झाडे तयार झाली की एका झाडापासून वर्षभरात 1400 ते 1500 फळे घेता येतात. वर्षातून दोनदा काढणी केली जाते. जुलै ते ऑगस्ट महिन्यात आणि दुसरी काढणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करावी. यातून वर्षाला सुमारे 1.5-2 लाख रुपये कमवू शकता.